शनिवारवाड्यातील गणेशमहालाच्या भग्न
अवशेषांशेजारी उभ्या असलेल्या फणसाच्या झाडाखाली आम्ही दोघे बसलो होतो. वैशाखाचे
दिवस होते. डोक्यावरती भानुबिंब आलं असलं तरी त्या दाट सावलीत त्याची दाहकता जाणवत होती. हजारी कारंजा आपल्या सहस्त्र मुखांनी तुषार उडवत होता. फडाच्या चौकात
आतपाचा खेळ चालला होता. काजळाने उजळलेले तिचे मोहक नेत्रव्दय डाव्या बाजुस उभ्या
असणार्या चिरेबंदी बुरुजावर खिळले होते. बर्याच वेळ कुणीच काही बोलत नव्हतं.
उजव्या बाजुच्या जिन्याच्या पायर्या चढुन, गणेशव्दाराच्या
सज्जावर जाऊन आम्ही उभे राहिलो. दोन डोळ्यांमध्ये लालमहाल भरत होता. जरीपटक्याचं
भगवं निशाण मोठ्या डौलाने त्यावरती फडकत होतं. त्या ध्वजाला मी मनोमन वंदन केलं.
वाहणार्या वार्यात उष्मा वाढतच होता.
'' काय पाहतोय?'', वार्याच्या झोताने ढळलेली आपली बट कानाशी एकसारखी करत तिने विचारलं.
''लालमहाल’’, मी शांतपणे उत्तरलो.
''त्यात काय आहे
एवढं? '', तिच्या लिंबकांती चेहर्यावरचा
अल्लड प्रश्न.
"प्रासादो
जगदिश्वरस्य जगतामानन्दोऽनुराज्ञया, श्रीमच्छत्रपते शिवस्य
नृपते सिंहासने तिष्ठत ।।"
संस्कृताची
उत्तम जाण असणार्या हिला मराठी भाषांतराची गरज नव्हती, माझ्या
या उत्तराने ती प्रसन्न हसली.
''दिपा, एक विचारु का?''
"विचारा ना"
माझ्या रुकारासोबत तिने नजर उंचावली. सज्जाच्या भिंती लगत उभी राहुन ती बोलु लागली.
''दिपा, महाराजांविषयी तोंडभरुन लिहलं गेलं. अगदी कवींद्र परमानंद, कवी भुषण असो वा असो सभासदकार यांनी सईबाईंविषयी तितकसं लिहलेलं अढळत नाही. कधी कधी मी शिवकालीन पत्रसंग्रह वाचते त्यावेळी त्या अष्टकोणी शिक्यात वर्धिष्णु श्रीमानयोगी जसे मला दिसतात तसचं मर्यादेच्या मोर्तबातही मला सईबाईंचा नितळ चेहरा दिसतो. म्हणतात, गंगोदकाप्रमाणे थोरल्या महाराजांच्या ओठी अंती सईबाईंचं करुण नाव होतं. मग सईबाईंविषयी जास्त लिहलेलं का रे नाही मिळतं?’’
तिच्या प्रश्नाचं उत्तर
माझ्याकडे नव्हतं. कारण परमानंदाच्या दोन श्लोकांवर अन् सभासदांच्या एका ओळीत मला
तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नव्हतं. माझ्या उत्तराची वाट न पहाता ती
मंत्रमुग्ध होऊन बोलत होती.
''परवा आम्ही
मैत्रिणी गेलो होतो सईबाईंच्या समाधी वरती फुलं वहायला. नागकेशराची भगव्या रंगाची
फुलं वाहताना मनात विचारांचं काहुर माजलं. पडणार्या पावसाच्या कुंद सरींखाली
विचारांना नाना रंगांची पालवी फुटत होती. एक क्षण वाटलं, वैदेही
शिवाय रामाचं चरिञ लिहता येणं अशक्य, तसा प्रयत्नही कुणी
वेड्याने करु नये. कदाचित पुरुषाच्या पुरुषार्थाला स्त्री तत्वाचा स्पर्श झाला तरच
ते सुर्यतेजाप्रमाणे झळाळुन निघत असावं. एकांगाने पुरुषार्थाच्या चारही सिमा गाठणं
हा केवळ काजव्याचा प्रकाश.
''तु कधी विचार
केलाय का तिच्या विषयी? मला ऐकायचयं तिला तुझ्या शब्दांत,
कधी ऐकवशील ?, ''
तिच्या या प्रश्नाने मी थोडा
हैराण झालो. आजपर्यंत मी कधी सईबाईंविषयी जास्त वाचलं नव्हतं. बराच काळ ती अखंडपणे
वाहणार्या पवित्र जान्हवी सारखी बोलतं होती. ती खुप बोलते. पण ती वाचाळ नाही.
तिची एक खासियत आहे. इतिहासाच्या मुकेपणाच्या बर्याच जागा आहेत तिला तोंडपाठ …पण तीही आहे एक किमयागार… जाणुन घेते बर्याच गोष्टी , मुकेपणाच्या निर्विवाद पोकळित
अडकलेल्या…तिचा खळखळाट सुरुच होता.अन मी…शांत…..एकदम शांत….
ब्रेक लागल्यासारखी ती थांबली
"इकडच्यांनी… मौनव्रत धारण केल आहे का…?" भावओल्या पेशवाईच्या
शीलसंपन्न भाषेत तिने विचारलं.
" काही नाही हो…कुंद पावसात खळखळणारा झरा ऐकत होतो…!"
मी तिला हव्या असणार्या भाषेत उत्तर दिलं.
माझ्या या उत्तरासरशी डोळ्यांना
भिडलेले, काजळ
लावलेले तिचे सुंदर डोळे लाजेने खाली उतरले.
"काहीतरीच
तुमचं! आम्हाला का ते ठावुक नाही ? सासुबाईंच्या कानी घालु
हा आम्ही हे ! “तिच्या या लाघवी बोलण्याने मी आवाक झालो,
चमकुन वर पाहीलं. ती कावरीबावरी झाली होती. नजर चुकवित गडबडीने ती
जिन्याकडे वळली. मी तिला हाक मारली, "अहो !
"
पण, ही हाक ऐकायला ती थांबलीच नाही. ती
गडबडीने पायर्या उतरुन जिन्याच्या तळाशी आली तर संकट तिच्यासमोर दत्त म्हणुन उभं
होत. त्या तीन वात्रट कार्ट्या ! तिची छाती धडधडत
होती. सारा चेहरा घामेजला होता. कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यांनी तिला
विचारलं,
" काय गं ,
काही झालं का ? "
त्यांचा शब्दसंकेत ध्यानी
आल्याने ती प्रसन्न हसली. मी जिन्यातुन खाली आलो तेव्हा ती हजारी कारंजाचे उडणारे
तुषार झेलित थांबली होती. का ते नाही माहीत मला. पण त्या सहस्त्र कारंजाच्या
तुषारांशी खेळणारी रमा मला तिच्यात दिसली.
वळव्याच्या पावसाची एक सुंदर सर
आली. वाहणार्या वार्यात मातीचा सुगंध मिसळला होता. अब्द अब्द धुमितेकडे निघाले
होतं. हस्त नक्षत्र माझ्या हातात होतं. दिल्ली दरवाजाच्या बाहेर निघताना, चित्रा, उत्तरा
अन् स्वाती या नक्षत्रांसमावेत तो पाऊस मुक्तकंठाने हासत होता.
रात्री सहज तिची आठवण आली. तिच्या नाजुक, तलम,
पालवी सारख्या, तांबरीदुपारीच्या फुलांसारख्या
लालचुटुक ओठांनी केलेलं मुग्ध भाषण आठवलं. तिच्या शब्दांत गुंतत गेलो. शब्द शब्द
आठवतं गेलो. तु कधी विचार केलाय का तिच्या विषयी ? मला
ऐकायचयं तिला तुझ्या शब्दांत, कधी ऐकवशील ? तिचा हा सावरीच्या फुलासारखा प्रश्न !! उत्तर देणं ही तर माझी गरज होती.
मी लिहायला घेतलं. लेखनी झरझर वाहु लागली.
सुर्य अस्ताला जाऊन एक घटिका लोटली होती. महालाच्या
महिरपी कमानी, खिडक्या, तावदाने आतल्या
प्रकाशाने उजळले होते. वैद्यांची वर्दळ आज जास्तच जाणवत होती. खालच्या चौकातील
कोपर्यांना मशाली उजळवतं होत्या. सईबाई राणी साहेबांच्या महाली मांसाहेबांसह
राणीवसा उभा होता. सईबाईंची प्रकृती जास्तच खालावली होती. मांसाहेब त्यांच्या
उशाशी बसुन त्यांचे केस कुरवाळित होत्या. समया तेवत होत्या. धुपदाण्यांतुन धुर
चढायचा थांबला असला तरी, महालात रातराणीचा सुगंध रेंगाळत
होता. दबलेल्या आवाजात राणीवसा ऐकमेकिंत बोलण्यात गर्क झाला होता. त्यांच्या
आक्कासा ज्वराशी झगडत अंथुरणाशी तळमळत होत्या. डाव्या बाजुला असलेल्या चिकाच्या
पडद्याआड पुतळाबाई रडणार्या शंभुराजांना शांत करण्याचा प्रयत्न करित होत्या.
महाराजांच्या प्रत्येक राणींच्या देवघरातील देव पाण्यात होते. कुलस्वामिनी
तुळजाभवानीला रात्रंदिवस अभिषेक सुरु होता.
काल रात्रीपासुन ज्वराने अधिकच उचल खाल्ली
होती. राणीसाहेब पाण्यावाचुन तडपणार्या मासोळी सारख्या तळमळत होत्या. मात्रा
उगाळुन वैद्यराजांचे हात थकले होते. सईबाईंनी मासाहेबांचा हात हाती घेतला, मासाहेबांना तो उष्ण स्पर्श जाणवला. अंग विस्तवाप्रमाणे फणफणत होते.
त्यांच्या कपाळाभोवती घर्मबिंदु साचले होते. अशक्तपणामुळे शरीर क्षीण झालं होतं.
नेत्रांभोवतीची काळी वर्तुळे सोडली तर सार्या चेहर्यावर गव्हाळी रंगाचा उजाळा
दिसत होता. कमानदार भुवयांच्या मध्ये अर्धचंद्राकृती कुंकु उठुन दिसतं होतं.
आजारपणामुळे क्षीण झालेल्या सुकलेल्या ओठांवर फक्त दोनच शब्द नांदत होते.
स्वामी...
सजलजलदघन वर्णाची, मर्यादा
पुरुषोत्तमाची प्रतिमा !! चंद्नकिरणांनी अभिषिक्त झालेला जिरेटोप, त्यावरती मोत्यांचा तुरा, अंगात पांढराशुभ्र चुणीदार
अंगारखा, पायात सुरवार, भालप्रदेशी
शिवगंध, रेखाटले होते. त्यावरती कस्तुरीचा टिळा शोभत होता.
समुद्राची अथांगता असणारे करारी डोळे अन् गरुडालाही लाजवेल असं उन्नत नासिक.
कानातील भिकबाळ्या त्या गंभीर चेहर्यावर सुर्यबिंबाचे तेज फांकित होत्या. गळ्यात
आई तुळजाभवानीची कवड्यांची माळ होती. कमरेभोवती लपेटलेल्या जरतारी गुलाबी शेल्यात
बिचवा कट्यार अन् पल्लेदार तलवार खोचली होती. ओठांतुन जगदंब जगदंब हे मेघगंभीर
शब्द उमटत होते.त्या प्रतिमेचे शिवदर्शन होताच त्यांचे उरलेसुरले भानही हरपले.
काळाचा पडदा मनात आलेल्या वादळाने अचानक नाहिसा झाला. अक्षी नेत्रांच्या
संदुकीमध्ये लपवलेल्या कितीतरी मोहक आठवणी त्यांच्या डोळ्यात तराळु लागल्या. एका
पणतीने दुसरी पणती उजळवावी, दिवेलागणी होता होता दिपमाळ
सजावी असचं झालं. आठवणींची एक भली मोठी पुष्पमाला घेऊनच रायगडीं हळवी पाखरं
सईबाईंच्या पुढ्यात येत होती, बागडत होती. बघता बघता त्यांची
जिवनवेलं फुलुन आली. किती रंगांची, गंधांची, आकारांची फुलं त्यावरती उमलली होती. सईबाई एक-एक फुल हाती घेत होत्या.
प्रत्येक फुलांत एक आठवण होती. त्या फुलांच्या गंधकोषात पाहु लागल्या. एका फुलात
दडलेलं होतं शिवबासोबतं लाल महालात टाकलेलं पहीलं पाऊल, सख्यांच्या
आग्रहास्तव पहिल्यांदा घेतलेलं इकडच्यांच नाव. पिवळ्या रंगाच्या फुलामध्ये एक
प्रशस्त आठवण होती. रायगडाच्या अंतःपुरात महाराजांना औक्षण करताना त्या तेजस्वी
डोळ्यांशी झालेली नजरा-नजर, तबकातील निरंजनाच्या प्रकाशात
दिसलेलं भव्य शिवगंध, अन् त्यावेळी आऊसाहेब महाली आल्याचही
लक्षात आलं नव्हत कुणाच्या, एका सफेद फुलामध्ये राजांच्या
छातीवर माथा टेकवताना गळ्यातील कवड्यांच्या माळांचा झालेला रोमांचकारी स्पर्श भरला
होता. किती किती ताजी फुलं होती ही. चौदा रत्नातील एक असणार्या पारीजातकाच्या
फुलांच्या सारखीच. मागे केदारेश्वरावरती रुद्र केला त्यावेळी महाराजांनी स्वहस्ते
केदारेश्वरावरती धरलेलं सुर्यपत्र, त्यांच्या मागे सुवर्णकलश
डोक्यावरती घेऊन चाललेली सात पाऊले; गज,अश्व,रथ, चतुष्पाद, गोष्ठ, वल्मिक, हाट अन् संगम
या सात मृत्तीकांनी राजांसोबत तयार केलेलं भव्य शिवलिंग. मालती, मल्लिका, जाई, जुई, कारोंटी, चाफा, मोगरा, नागकेशर, पुन्नग, मोह, चमेली, बकुळ, कमळ, कुंदर, गुलाब, रातराणी या
वनसंजिवक पुष्पसंभाराने सजवलेली मंदीराची वाट. यज्ञ सांगता समयी वेदींवर समस्त
ब्रम्हवृंदांच्या, आऊसाहेबांच्या, अग्निनारायणाच्या
साक्षीने राज्ञीसन्मान म्हणुन महाराजांनी त्यांच्या केशसंभाराच्या सुबक
खोप्यामध्ये सुवर्णफुल माळलं होतं. ते राजलक्षण होतं. अनाहुतपणे त्यांचा हात
वेणींमध्ये गेला. त्या सुवर्णफुलाचा स्पर्श होताच त्यांच्या क्षीण चेहर्यावर
प्रतिपदेच्या चंद्राच हास्य उमललं.
अवघी रात आठवणींत सरली होती. मांसाहेब
अजुनही त्या तुळजाभवानीसमोर जपाची माळ ओढत होत्या. गार वारा सुटला होता.
ब्राम्हमुहुर्त सुरु झाला होता. ब्रम्हगिरीकडुन येणारा वारा सईबाईंच्या अंगाला
बोचु लागला मग आऊसाहेबांनी त्यांच्या अंगावरची शाल एकसारखी केली. ध्रुवमत्स्य तारका
ध्रुवासोबत विझत चालल्या होत्या. वायव्येच्या कोपर्यातली समई अजुन तेवत होती.
वाहणार्या वार्यावरती सुर जागे झाले होते. पण ती मंदिरात गाणार्या भाटाची नित्य
भुपाळी नव्हती. जात्यावरच्या ओव्या सुरु झाल्या होत्या.
पहाटेच्या वार्यावर । निशीगंध बहरला । दिगंताला गं
भेदुन । रथ जानकीचा गेला ।।
दुर पंढरी पंढरी । चंद्रभागे तिरी वास । येई पाडुरंगा
वेगी । कान्हा जाहली उदास ।
पंढरीच्या पांडुरंगा । तुझा गाईन काकडा । महाव्दारी जनी उभी । दोन्ही
पाणावल्या कडा ।।
ऐके पतितपावना । तुला वाहते तुळस । सई शिवबाला देई ।
देवा सोनियाचे दिस ।।
क्षणभरीच या इथे थांबले
देवा तुमच्यासाठी
लवकर येऊन राया सोडा
हृदयाच्या गाठी ।।1।।
आज संपले इथले देणे
हाती न माझ्या काही उरले
नक्षत्रांचे देणे तुमचे
आज नेत्री कां माझ्या भरले ?
सान सई ती कौतुक केवळ
आऊ जिजाऊ ममता आगर
थोर किर्तिकर आपण स्वामी
यश किर्तीचे केवळ आगर
धन्य सई मी धन्य सईपण
धन्य भाग्य हे सखये माझे
आज अवेळी मजला देखुन
आकाशीं तो म्रुगांक लाजे
नाथा लवकर आपण यावे
गात्र भिजले आज कोवळे
जातां जातां दो नेत्रीं मी
रुप भरावे आज सावळे
स्वराज्य व्हावे श्रींची ईच्छा
नसेल सोबत सई सदोदित
दिगंत वैभव पाहुन तुमचे
तृप्त होतील देवीं देवही
प्रित आपुली फुल लतेचे
सांभाळावे शंभु बाळा
माता आपण पिताच आपण
शतदा व्हावे शिवभुपाळा
बाले किल्यावरी फडकतो
भगवा डौलाने जोमाने
आज सई मी मनीं खिन्न कां
गिळलें सौख्य आज व्योमाने ?
प्रजासौख्य हे सौख्य आपुले
पुत्र स्वामिनी नसे नृपाला
रामासम हे राज्य आपुले
रामासम नृप असे जगाला
हास्य उमलते ओष्ठी माझ्या
हास्यातुही ते तुम्हीच स्वामी
श्वासांतुन मग तुम्हीच केवळ
मुग्ध मैथिलीचा जैसी रामी
नेत्रांमधुन प्राण तेवुनी
वाट पाहते तुमची देवा
यावे लवकर स्वामीं आपण
तव चरणांची घडु दे सेवा
चंद्रभारले जगणे माझे
चंद्रभारल्या शिवशक्तिने
आज धन्य मी असे सखे गे
कृतार्थ होईल शिवभक्तिने
आई भवानी आज उभी ही
मुठींत मिटल्या कौल घेवुनीं
शिवबाची मी भाग्य स्वामिनि
जाते अहेव मळवट भरुनी
शिवदासी मी जन्मांतरीची
एक अशिर्वच देई भवानी
शिवभाग्याच्या कुंम्कुमात या
सई जाऊ दे आज वाहुनीं...
सईबाईंनी पाणी मात्राही झाली होती. आई
तुळजाभवानीला अभिषेक सुरु होता. त्याचे शब्द शब्द त्या महालात साठत होते.
तुळजाभवानी समोरचे मागितले. हेमगर्भाची निरंजन अचानक फडफडलं, निरंजनातील तुपाची मात्रा आता संपत आली होती. गडबडीने तुपाची धार
उजवण्यासाठी पुतळाबाईंनी घृतपात्र उचललं......खुप उशीर झाला होता… त्याच वेळी
अंतःपुरात आकांत उसळला.
''इकडच्यांनी… मौनव्रत धारण केल आहे का…?’’
''काही नाही
हो…कुंद पावसात खळखळनारा झरा ऐकत होतो…!’’, मी तिला
हव्या असणार्या भाषेत उत्तर दिलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा