गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

।। श्रीकृष्णाभ्यां नमः ।।

प्रश्नचिन्ह ! हो प्रश्नचिन्हचं !! अगदी उगवल्या पासुन ते मावळत्या सुर्याची अखेरची किरणे अंगावर पडत रहावी तिथपर्यंत. चंद्राचं पिठुर चांदणं पडावं अगदी पहाटेची शुक्राची चांदणीही उगवावी. तु माञ जागी असावी मुसमुसणार्‍या डोळ्यांसारखी, अहोरात्र माझ्या मेधाशक्तीशी उनाड मुलीसारखी भोंडला मांडणारी. तुझे हे अनंत खेळ मी या दिवसात पाहीलेतं. श्रावणातल्या उन्हा-पावसाच्या खेळासारखा हा खेळ तुच रंगवित होतीस. मनामध्ये सातारंगांनी सजलेलं इंद्रधनु सजायचं. त्यावरती तुझ्या नावाचा हिंदोळा बांधायला गेलं की भरुन यायचं आभाळं मनात दाटलेलं. सातरंगाचं फुलपाखरु हातावरुन अलगदपणे निघुन जायचं ना लहानपणी तसचं हो.. हो.. अगदी तसचं .. हे इंद्रधनुही गायब व्हायचं. कुठल्यातरी गुलाबी फुलाच्या गंधकोशी लपुन बसायचीस. गंधकोशातील केशरही दरवळायचे तुझ्या बुंथीचा स्पर्श झाला की, डोकावलं भिरभिरत्या नजरेने मी कधी कधी तिकडे पण तु अढळं होतीस त्या उत्तरेच्या तार्‍यासारखी मिनमिनत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहणारी. तार्‍यावरुनही तुझीच याद. अगदी बेमालुम दवा असल्यासारखी दुःखानी भरलेल्या जिवांच्या रुक्ष रुक्ष देहांवरुन प्राजक्तफुलं ओघळल्यासारखी. तुझं अस्तित्वचं मुळी एक प्रश्नचिन्ह बनुन उभं आहे माझ्या दिठीदीठीतं. तुझं अन् माझं नात तरी काय गं. प्रश्नचिन्ह म्हणुनच कायम उभी तु. तुला कितीही वाचलं तरी तु कळत नाहीस. तुला पहावं म्हटलं तरी दृष्टीच्या पैलतटावरतीच तु ! स्वप्नांसारखंच का गं तुझं अस्तित्व ? हवहवसं अन् क्षणभंगुर ? निरुद्देशपणे मी चाललोय तुला शोधताना. त्या ओल्या रेतीमध्ये उमटलेल्या पाऊलखुणा विसरणंही मला झालयं अशक्य ! लाटांवरती मावळणार्‍या सुर्याला पाहीलं की वाटायचं त्या काषाय रंगामधुन सात रुपेरी अश्वांचा रथ दौडत घेऊन येशील मजसमीप अन सांगशील तुझ्याबद्दलं. लाल झालेला तो गोळा रत्नाकराच्या आधीन व्हायचा अन् रेतीमधीलं काढलेलं तुझं नावं लाटेनं पुसुन गेलं की पाय माघारी निघायचे निरुद्देश प्रवासासारखे. प्रवाह पतित झालेल्या फुलासारखा वाहतं चाललोय गं तुझ्यामागे मी पण तुझा शोध संपत नाही. 

             ओह माय गॉड दिपदा लव्हलेटर लिहतोय? आय कान्ट बिलिव्ह इट !!! किंचाळण्याचाच आवाज. मी मागे वळुन पाहीलं. स्वाती आश्चर्याने डोळे वटारुन आजि म्यां ब्रम्ह पाहिले या आविर्भावात माझ्याकडे पाहत होती. मी लेखनीचा टाक मोडला. मुद्दामचं डायरी मिटली. तिच्या हातातला कॉफीचा मग घेतला अन् बाल्कनीमध्ये निघुन गेलो. मिश्किलपणाची मलाही लहर आली होती. माझ्या पाठोपाठ तिही आली. हातातल्या डायरीकडे पहातच म्हणाली. 

‘’दादु  डायरी दे ना रे ती...’’

‘’ .........’’ ,मी.                        

‘’ दे ना, मी नाही ना सांगणार कुणाला ‘’ अगदी गळ्यात हात गुंफुन लाडात येऊन ती बोलत होती..                                         

‘’ नको तु लहान आहेस ‘’

‘’ नाही ऽऽऽऽऽऽ मी मोठी आहे. आय एम ए बिग गर्ल’’

‘’ नो.... नेव्हर मी देणार नाही. जा खाली जा अन् जर आईला मदत कर..’’

दादु आता जर नाही दिलीस ना... तर सरळ मम्मीला जाऊन सांगील कि आमचे जेष्ठ भ्राताश्री कोण्या एका मृगनयनी युवतीवर अनुरुक्त झाले असुन त्या सुंदरीस आपले मनोवांछित व्यक्त करण्यासाठी अभ्यासाच्या निमित्त करुन प्रेमपत्र लिहीत आहेत. मग पुढचं पुढे तु बघ रे बाबा ! खट्याळपणे हसत, शह देणार्‍या राणीच्या नजरेने ती पहात होती. शह अन् काटशह या लढाईत मला रस नव्हता. मी विनाकारण राजा एक घर मागे सरकवला. हातातली डायरी तिच्या स्वाधिन केली. जीतं जीतं च्या आनंदाने तीने डायरी घेतली अन्  झोपाळ्यावरती झोके घेत वाचु लागली. 

‘’ ए बावळट लव्हलेटरची सुरुवात अशी करतात काय? मंद कुठला...’’

‘’ का गं काय झालं? काही चुकलं का? , मी

‘’ अरे बाबा लव्हलेटरची सुरुवात कुणी देवाचं नाव घेऊन करतात काय? म्हणे श्री कृष्णाय वयं नुमः स्टुपिड कुठला...’’ टेबलवरची पेन्सिल घेऊन तिने त्यावर काट मारली..

‘’ ओव्ह आय सी...सॉरी.... आणखी काही ? ‘’

‘’ थांब थांब आधी वाचु तर दे’’,  पेन्सिल दातांमध्ये धरुनच तिने उत्तर दिलं. अख्खा पॅरा वाचुन झाला अन् तिने विचारलं, दादु काय रे हीच नाव ? तुझ्या कॉलेजात आहे काय? कुठे रहाते ? अगदी पिच्छा पुरवायला सुरुवात..

राधा !!! निस्सीम प्रेमाची अनस्युतपणे चालणारी धारा !!! जिच्या नावाच्या नुसत्या उच्चाराने देहाची मुरली घुमावी अशी चिन्मयस्वरुप राधा.. राहते कुठे विचारशील तर थोर थोर विचारवंतांनाही तिचं अस्तित्व कोड्यात टाकणारं आहे. नाना विचार प्रवाह आहेत एक विचार होत नाही. गेली कित्येक दिवस मी तिला शोधतोय. तिच्या अस्तित्वाच्या समकालीन खुणा काहीच मिळत नाहित. आत्ताही तोच विचार करत होतो. खरं सांगु ? श्रध्दा अन् भावविश्वाची तेजाळती तारका असणार्‍या राधिकेचं अस्तित्व मात्र आहे विवादास्पद. श्रध्दा अन् वास्तव ही दोन्ही एकाच रेशमी धाग्याचें दोन टोकं त्यांचा सुवर्णमध्य साधायचा हे कर्मचं मुळी कठीण. ज्या ज्या वेळी श्रध्देने मी राधिकेला श्रीकृष्णाच्या वामभागी पाहतो त्या वेळी वास्तवाच्या विस्तवही चंद्राप्रमाणे शितल भासु लागतो. अन् ज्या ज्या वेळी मी न्यायबुध्दीने वास्तवाकडे पाहु लागतो त्या वेळी राधीकेचं अस्तित्वचं खोटं वाटु लागतं.

‘’ राधा अन् खोटी? काय बडबडतोय ?’’,  घुटमळतच तिने विचारलं.

‘’ हो खरं तेच सांगतोय. हे अगदी तसचं आहे की तलम वस्त्रावर सुंदर विणकाम करुन सुंदर नक्षी बनवावी. पण तेच कापड उलट्या बाजुने पहायला गेलं की फक्त विस्कटलेले धागे दिसतात. त्यातील सौंदर्याचा अगदी नाश होऊन जातो. म्हणजे जे वाचलं वाचणात आलं. ज्यात नव्हता भाबडेपणा.तर्काच्या कसोटीवर जे उतरत होतं तेच सांगतोय तुला. वास्तविक प्रमाणभुत ग्रंथानी राधेकेच्या अस्तित्वाबद्दल ठोस लिहलेलंचं नाही.’’

‘’मग ही राधा आली कोठुन?’’,  तिने उत्सुकतेने विचारलं.

‘’ गितगोविंद या संस्कृत काव्यानेच राधिकेचं उन्नयन केलं. या महाकाव्याचा रचयिता म्हणजे कवी जयदेव. प्राची नदीच्या काठावरतीच त्याने शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, आणि ज्योतीषाचं शिक्षण पुर्ण केलं. बंगालदेशाचा जो शककर्ता राजा लक्ष्मणसेन याच्या दरबारी तो होता. गितगोविंद हे महाकाव्य नाही किंवा ते खंडकाव्यही नाही. शृंगार रसाने परिपक्व झालेलं हे एक गीतनृत्यनाट्य काव्य आहे. या काव्यातील अर्क शोधायचा झाला तर हे काव्य राधा अन् कृष्ण यांच्यामधील स्नेह, वियोग, उत्कंठा अन मिलन यांचा गाभा आहे. राधिकेमध्ये या कविने अभिसारिका, विरहोतकण्ठिता, वासकसज्जा, विप्रलब्धा, खण्डिता, कलहान्तरिता, मानिनी अन् स्वाधीनभर्तृका या अष्टनायिका चित्रित केलेल्या आहेत. विरहाने व्याकुळ झालेली राधिका, कृष्णावर अधिराज्य गाजवणारी राधिका, त्याच्या प्रेमाने देहभान विसरलेली राधिका त्याने रंगवली आहे. श्रीकृष्णाच्या बाबतीत मात्र त्याने संस्कृत साहित्यातील धीरोदात्त, धिरोध्दत, धीरललित अन् धिरप्रशांत या चार नायकांपैकी भरतमुनींनी वर्णण केलेल्या प्रणयी नायकाचे म्हणजेच धिरललित नायकाचेच वर्णन केले आहे. दशावतारचरित, सरस्वतिकंठाभरण, यशस्तिकचंपू, वेणीसंहार, संगीतचुडामणी या लिलाशुक अन् आर्यसप्तशति सारख्या सुंदर वाङमयात राधा अन् गोपींचा उल्लेख दिसतो. पण यावरही कळस चढवला तो जयदेवाने. बाराव्या शतकापुर्वी राधिकेचा उल्लेख कृष्णासोबत होत होता का ? या बद्दल शंकाच आहे. कारण, संत ज्ञानेश्वर अन् संत नामदेवांच्या कालखंडामध्ये राधिका कृष्णाला बिलगलेली नव्हती. माऊलीं अथवा नामदेव महाराज यांच्या कोणत्याही गौळणी अथवा तत्सम काव्यामध्ये राधिकेचा उल्लेख नाही. विरहकाव्यं तर माऊलींनी इतकं सुंदर लिहली की, चापे वो चंदनु । देवकी नंदनु । वीण नावडे वो । चांद वो चांदणें ।। अथवा नंद नंदनु घडी घडी आणा । तयाविण न वांचती प्राण वो माय । बापरखुमादेवीवरु विठ्ठलु गोविन्दु । अमृतपान गे माय ।। जयदेवानंतर जे संतकवी झाले त्यांच्या काव्यात मात्र राधेचा उल्लेख जरुर आला आहे. मराठी संत कवी एकनाथांनीही राधेला अनेक गौळणींमध्ये स्थान दिलं आहे. यावरुनच जयदेवाने राधा या पात्राचं उन्नयनीकरण केलं असाच तर्क करता येतो. या नंतर साहित्यातुनच राधिकेचा धर्मामध्ये प्रवेश झाला. शशिभुषणदास गुप्ता यांचाही तर्क असाच होता. यानंतर राधा हे तत्व खुपचं जलद गतिने विकसित झालं. निम्बक संप्रदायाचे आचार्य निम्बकाचार्य यांनी भगवान श्रीकृष्णांसोबत वामभागी असणारी राधीका ही गोलोकातील भगवान श्रीकृष्णाची दिव्य नित्य सहचारीनी आहे हेच तत्व सांगितले. निबार्क दशश्लोकी मध्ये म्हणतात

अगे तु वामे वृषभानुजां मुदा विराजमानामनुरुपसौबगाम् ।

सखी सहस्ञे परिसेवितां सदा स्मरेम देवी सकलेष्टकामदाम् ।।

 

            गौडीय वैष्णव गोस्वामींच्या कालखंडातच राधा हे तत्व जनमानसात रुजलं. रुप गोस्वामी, जीव गोस्वामी यांनी श्रीकृष्णासह राधीकेचाही स्वीकार केला. या नंतर बलदेवानेही ब्रम्हसुत्रावरती गोविंदभाषा नावाचं भाष्य लिहलं. या भाष्यामध्ये राधीकेला त्याने ब्रम्हांडाची अचिंत्य अनंत शक्ती हे असं म्हटलं आहे. चैतन्य महाप्रभुंनी राधा या तत्वाला प्रकृतीच्या स्वरुपात नटवलं. अन् राधा ही अविरतपणाने श्रीकृष्णाला बिलगली.  

‘’ याचा अर्थ असाच घ्यायचा का? की राधिका नावाची कुणीही स्त्री भगवान श्रीकृष्णांच्या जिवनप्रवाहात नव्हती. निरागसतेने स्वातीने विचारलं.                                             

‘’खरचं स्वाती याचं उत्तर मला माहित नाही. राधिकेला तर्कातीत, गुणातीत म्हणावं की न म्हणावं याच भोवर्‍यात माझा तर्क अडकला आहे. या ओडीशा राज्यात एक आख्यायिका सांगितली जाते. जयदेव जेव्हा गितगोविंदाची रचना करत होते. तेव्हा राधेने तिचे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवावे अशी विनंती भगवान श्रीकृष्ण राधिकेस करतात. ही कविकल्पना जयदेवाच्या मनात आली. पण भगवान श्रीकृष्णाचे देवता स्वरुप लक्षात घेऊन जयदेवाने हे पद लिहायचे टाळले. एक दिवस तो असाच स्नानाकरता गेला असता. भगवान श्रीकृष्णांनी जयदेवाचे रुप घेतले. पद्मावतीकडुन जयदेवाची लिखाण सामग्री घेतली अन् स्वतः 

स्मरगरलखण्डनं मम शिरसिमण्डनं धेहि पदपल्लवमुदारम् ।

ज्वलति मयि दारुणो मदनकदनानलो हरतु तदुपाहितविकारम् ।।

ही कल्पना उतरवुन काढली. घरी परत आल्यानंतर जयदेवाला सर्व प्रकार समजला. आनंदाने त्याने गितगोविंदाची रचना पुर्ण केली. या पदाबद्दल विचार केला तर राधिकेचा अधिकार आपल्याला कळुन चुकतो. म्हणुन प्रगटे ते न दिसे । लपे तव तव आभासे । प्रगट ना लपालासे । न खोमता जो ।। हा अमृतानुभव राधिकेबद्दलही येतो. राधिका होती नव्हती हा निर्णय घेण्यास मी पात्र नाही. ती माझी योग्यताही नाही.  किंबहुना तो प्रयत्नही आपण करु नये. पण माझ्याही मनःपटलावरती राधिका ही प्रेमाचा मुर्तीमंत झरा म्हणुन खळाळत वहात आहे. अगदी भगवान श्रीकृष्णाचं देखिला गे माये यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेचा हेच वर्णण मला अधिक भावतं. काल त्या अभयारण्यातही मला रहावलं नाही. मनात वाटलं कधी कधी कृष्ण भगवान राधिकेला घेऊन वनविहार करत असतील. वाटेने जाता जाता राधिका अनेक अनोळखी फुलांविषयी विचारतं असेलं . भगवानही तिची जिज्ञासा पुरवित असतील. फुलांचे कितीतरी गुच्छ त्यांनी राधिकेला दिले असतील. त्या नदीतटावरती आल्यानंतर वाटलं स्वतः भगवान श्रीकृष्ण राधिकेला गोकुळ अन् वृंदावन पाहताना हेच म्हणत असतील....

या इथे राधिके थांब गडे

या कालिंदीवर मन हे जडे

या इथे राधिके थांब गडे ।।ध्वृ।।

 

पहा मालती शुभ्र भोवती

मृग शावक ते स्वैर धावती

भ्रमर रंगुनी गंध सेवती

सतरंगी पाखरु गगणी उडे

या इथे राधिके थांब गडे ।।01।।

 

समोर लतिका लाजुन गाली

नवपुष्पांनी बहरुन आली

मृदुगंधाच्या ओष्ठी लाली

गवतात पाचुचे सैल सडे

या इथे राधिके थांब गडे ।।02।।

 

पहा पैल तो याग चालला

यज्ञ धुमाने वायु भारला

देवर्षींनी षड्ज पेरला

हा क्रतु गोकुळी सहज घडे

या इथे राधिके थांब गडे ।।03।।

 

अधीर वाहते यमुनामाई

तटी उभ्या या सवत्स गाई

हृदय मोहवे मोहक राई

राऊळीं चौघडा जलद झडे

या इथे राधिके थांब गडे ।।04।।

 

रंग सांडला निळा गगणभर

कुठे काढीते कोकीळ सुस्वर

सळसळ वारा तृणपर्णांवर

संमिश्र नाद तो श्रवणीं पडे

या इथे राधिके थांब गडे ।।05।।



फले भारले विपुल तरुवर

शाखा पल्लव पसरवती कर

पितरंग अन् अंगी परिकर

परिपक्व फलांना जाती तडे

या इथे राधिके थांब गडे ।।06।।

 

राधे राधे सखे मैत्रिणी

प्राणप्रिये तु स्निग्ध जिवनी

तुझी साथ अन् प्रित जीवनी

तव कटाक्ष माझ्या हृदयी भिडे

या इथे राधिके थांब गडे ।।07।।

 

भान हरवलेल्या हरणीसारखी स्वाती माझं बोलणं ऐकत होती. मी बोलायचा थांबलो. स्वाती परत परत तोच परिच्छेद वाचत होती. अचानक तिच्या मनात काय आलं काय माहीत. ती उठली टेबलावरील खोडरबर घेतला. मघाशी पेन्सिलीने खोडलेले श्रीकृष्णाय वयं नुमः हे शब्द तिने पुन्हा नितळ केले.

 ‘’ दिपदा आणखी एक कॉफी घेणार?’’, स्वातीने विचारलं,

‘’ जा पटकन घेऊन ये ’’ एव्हाना तिन्हीसांज झाली होती. देवघरातुन धुपाचा सुगंध दरवळला होता. रेडिओला आम्हा दोघांचं आवडतं गाणं लागलं होतं. तिन्हीसांजा सखे मिळाल्या देई वचन तुला आज पासुनी जीवे अधीक तु माझ्या.....

अगदी जिंकायला निघालो होतो तुला... पण गाडुन आलो शरणागतीची पांढरीफट्ट पताका.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा