वार्यावरती फुलातील सुगंध निघुन जावा अन् देठावरती ओस फुल रहावं, संथपणे वाहणार्या प्रवाहात कुठेतरी एखादं कोवळं निर्माल्याचं फुल अडकुन रहावं तसच मन शरिराच्या देठावरती अडकुन राहीलेलं रितं अगदी रितं… ती मुलं…ती मुलं व्रतस्थ होती वेश मुनींचे होते हातांत गंधर्वांची विणा घेऊन कोकीळकंठांनी ती तीनही सप्तकात गात होती. त्यांच्या मधुर स्वरांनी ग्रीष्माच्या नाजुक टोकरीत वसंताची फुलं टाकली होती. सप्तस्वरांचा नवरसांशी सुरेख संगम होत होता. त्यांच्या गायनाने अयोध्येचं अंतःकरण द्रवीभुत झालं होतं. शरयु मात्र संथ वाहत होती. तिच्या काठी एकाच वेलीवरती उमललेली फुलं प्रवाहातुन वेगळी होऊन प्रथमच एकमेकांना पहात होती. महर्षी वाल्मिकींचे ते शिष्य होते. अवघ्या आशा श्रीरामार्पण म्हणुन ते बटु रामकथेचं गायन करीत होते. त्यांच्या स्वरांमध्ये साम, मुद्रांमध्ये यजु, अन् अभिनयामध्ये ऋग्वेदाचे विलास होते. ग्रीष्माच्या गार वार्याची झुळुक अंगावरुन गेली. नकळत रोम उभे राहिले. मी त्या स्वांत समाधीतुन अचानक जागा झालो. हो त्या समाधीला स्वांत समाधी हेच योग्य नामाभिदान ठरेल. मी अंगाभोवती शाल घट्ट केली. हेमंत दादाला कन्यारत्नप्राप्ती झाली होती. तिला पहायला आम्ही गेलो होतो. संध्याकाळी वाल्हे गावात सहज एक पाटी दिसली आद्यकवी महर्षी वाल्मिक समाधीकडे ..या अनाहुत पाटीने मला या मंदिरात येऊन उभा केलं. हे वाल्मिकींच समाधी मंदीर होतं. मुख्य गाभार्यात समाधीस्थान होतं. समाधी शिळा ही फुट दिड फुट वालुकाश्म पाषाणातुन घडवलेली होती. हे प्राचीन स्थान असल्याने समाधी शिळा झिजुन गेल्यासारखी दिसतं होती. त्या आद्यकवीच्या समाधीवरती मी चाफ्याच्या दोन कळ्या भक्तीभावाने वाहिल्या. मन गहिवरुन आल्यासारखं झालं. रामायण हा माझ्या खुप आवडीचा विषय होता. गाभार्यासमोरच व्यासपीठावरती भगव्या सुती कापडामध्ये वाल्मिकी रामायणाची एक प्रत ठेवली होती. अबीर बुक्यामध्ये न्हालेलं रामायण.. मी त्यावरती माझं मस्तक टेकवलं. भाळी अबीर बुक्का लागला. माझ्या अंतरंगात उगीच की काय एक उर्मी दाटुन आली. वाटलं की काहीतरी निमित्त करुन ईश्वर त्याचे खेळ खेळत असतो. आपण फक्त त्याचे गुलाम. पण मोरपीसांनी भुर्जपत्रांवरती ‘ मां निषाद मैथुना..’ .या पहिल्या काव्याने सुरुवात करुन अवतार पुर्व श्रीराम चरित्र लिहणारा महात्मा वाल्मिक म्हणजे देवाला ही आपल्या लेखणीवर नाचवणारे दैवी कृपा लाभलेले पात्र. या आद्यकवीचे दर्शन घेऊन कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. कदाचित मनातल्या मनात म्हणालो देखील हे काव्यतिर्था तुझा निसटता कृपाकटाक्ष आम्हांवरती असु दे.. ‘यस्याः कटाक्षमात्रेण जायन्ते विबुधा नरः’ त्या समाधी स्थानाचं दर्शन घेऊन मी घरी आलो.
दोन दिवस मग खुप काम पडलं. वाचायला तर वेळच मिळाला नव्हता. संध्याकाळी घरी आलो. शेजारी सुवासिनींचा काहीतरी कार्यक्रम होता. आई तिकडेच गेली होती. अंगभर आळस दाटुन आला होता. बॅग बाजुला ठेवली अन् तडक बिछाण्यावर पडलो. दिवसभरच्या कामाने शिण आला होता. कधी झोप लागली ते कळलच नाही. साधारणतः आठ साडे आठ झाले असतील आईचा प्रेमळ हात अंगावरती फिरला. पानं केली होती म्हणुन ती उठवायला आली होती. जेवणं झाली. प्रेमा दिदी माहेरी आली होती. तिच्या येण्याने सारं घर कसं आनंदाने न्हाऊन निघालं होतं. ओसरी वरती टांगलेल्या पिंजर्यातील राघुला ती मिरच्या भरवत होती, स्वातीने अंगणात चटई टाकली. लहाणपणी असचं उघड्या आकाशाखाली आम्ही सारीपाट खेळत असु. अंगण चांदण्यांनी सजलं होतं. लाईट काही कारणामुळे गेली होती. तारांगणात असंख्य तारे सजले होते. गडद अंधारात चांदण्याही तितक्याच गडद दिसतात. फिकट दिसणार्या चांदण्या देखील गडद होत जातात. पुर्वेला पातळ चंद्रकोर निघाली होती. पलीकडे केळीच्या खुंटांवर पाने लवुन दाटीवाटीने काळोखात बसली होती. तुळशीसमोरचा दिवा वार्यात कसातरी तग धरुन होता. शारदाताई अन् आई सोप्यावरती गप्पा मारत बसल्या होत्या. स्वाती, अन् मी चटईवरती गप्पा मारत बसलो होतो.
''किती मस्त चांदणं पडलयं ना दादु ?''
''हो गं छान वाटतयं खुप...'', मी
''क्षितीजावरच्या लुकलुकणार्या चांदण्या पाहिल्या की मन कस चकोरासारखं होतं, नाही ? मी रोज पुजेसाठी फुले गोळा करते ना त्यावेळीही असचं चांदणं पडलेलं असतं. वेलीवरची फुले वेचताना अचानक आकाशात नजर गेली ना.. कि वाटतं ही फुलं वेचताना यांच्या बरोबरचं तारांगणातील चार दोन चांदण्याही वेचुन घ्याव्या अन् अलगद वेणीमध्ये माळाव्या. मी फक्त कुंदकळ्यांसारखी अबोल होऊन पहात राहते. आकाशातील कुठल्यातरी फिकट चांदणीशी नजरानजर झाली ना की मी माझी उरतच नाही. वेलींवरच्या फुलांशिवाय बाकी कुणी बोलत नाही. दवांनी भिजलेल्या लुसलुशीत गवतावरती हळुच पाऊल चालु लागतात. पायांमधली अवखळ पैंजने छन छन छन छन जागी होतात. खुपदा असच होताना मात्र खुप वेळ सरलेला असतो. चांदण्या फिकट..आणखी फिकट होत जातात. मी ओली फुले अन् हिरवी पाने भरभर वेचुन घेते. माजघरातुन आईचा.. माई..माई..गं असा आवाज अगदी सुपारी बागेपर्यंत येतो अन् घाईघाईत टोकरीतली फुलं वारा हळुच आपल्यासोबत घेऊन जातो.'' भिजल्या कातळासारखी स्वाती बोलत होती.
'' किती छान बोलतेस गं ?'', मी तिच्याकडे पहात म्हणालो.
''मी ? अं…हं.. माझ्यापेक्षा माझी वहिनी छान बोलते'' , गालातल्या गालात हसुन स्वाती म्हणाली.
''अं…? '', मला अगोदर तिच्या बोलण्याचा रोखच कळला नव्हता..
''नाही म्हणजे मी रोज एक काम करत जाईल, कि वहिनीलाच नेत जाईल फुलं तोडायला सुपारी बागेत. तुझी काय हरकत ? अं… हरकत नकोच.. दादापण माझा अन् वहिनीही माझीच त्यामुळे काहीच प्रश्न नाही. न जाणो, कधी हाती न लागलेल्या चांदण्या तिच्या सोबतीने हाती आल्या तर.. . ? ''
स्वाती आपल्या नेहमीच्या पध्दतीत बोलत होती. अचानकचं ती स्वतःशी थांबली काहितरी चुकल्याचुकल्यासारखी जीभ चावत म्हणाली
''अरे चुकले चुकले तिला घेऊन गेले तर त्या शुभ्र चांदण्या हाती लागायच्याच नाहित.''
मला काही कळलचं नाही मी सहज विचारलं,
'' का बरं?''
''अरे दादु चांदण्या वेचायला बरोबर चंद्र घेऊन गेले तर हातात चांदण्या लागतील कश्या ?''
हो, कोपरखळी मारायला हिच्यापेक्षा वरचढ कुणी असुच शकत नाही. मी गप्प बसलो. हा शालजोडीचा सत्कार स्विकारुन मी उठलो. बहुदा लाईट आली असावी. जिन्याकडे जाणार तोच स्वातीचा आवाज आला,
''दादा उद्या सुट्टी आहे ना रे..?’’
''का बरं.. ?'', जाता जाता मी विचारलं..
''अरे म्हटलं सकाळी येशील का माझ्यासोबत सुपारी बागेत ? नाही म्हटलं तुला पहाट काय असते ते दाखवते. नाहीतरी कुंभकर्णासारखा झोपलेलाच असतोच सुट्टीच्या दिवशी. लवकर उठ झाडावरच्या कळ्या नुकत्याच उमलायला लागतील ना अगदी त्यावेळी मी उठवेन तुला. अन् रोजच्यापेक्षा जरा वेगळा अनुभव घेशील. येशील का मग ? ''
माझ्या ओठांतुन नकळत होकार बाहेर पडला. वरती आलो. लाईट अचानक गेल्याने वरुन थडथड नाचत खाली येणार्या स्वातीने खिडक्या लावल्या नव्हत्या. माझ्या टेबलवरचे कागद खिडकीतुन येणार्या वार्याने अस्ताव्यस्त झाले होते. मी हळुहळु ते उचलुन जुळवु लागलो. खिडकी जवळच्या टेबलवर एक अस्वस्थ पुस्तक स्वतःशीच फडफडतं होतं. पानझडीच्या दिवसांत झाडाच्या फांदीवरती कुठेतरी स्वांतसुखी पानासारखं ते पान दिसतं होतं. मी जरा जवळ गेलो. ती कवी श्रीधर लिखित श्रीरामविजयाची प्रत होती. फडफडणार्या पानाला बोटांचा आधार देऊन मी फडफड बंद केली. मी जेव्हा ते पान पाहिलं त्यावेळी मी स्तब्ध झालो. अचानक हे रामायण आलं कुठुन ? अन् त्यातुनही जे पान स्वतःशीच एकाकी फडफडत होतं. त्या पानावर वाल्मिकीचं चित्र होतं. ही विलक्षण योगायोग होता. योगायोग म्हणता येईल का? कदाचित नाही ..कदाचित हो… पण मी त्या चित्राकडे पहात राहिलो. विचारांची भागीरथी झुळझुळ वाहत होती. मनात कुठेतरी वाटलं हे फडफडणारं पानं काहीतरी सुचवतयं. मी शांतपणे ग्रंथ हातात घेतला. भगवान वाल्मिकींच्या टिकेवरुनच हा ग्रंथ सिध्द झाला होता. श्रीधराने लिहलेला श्रीरामविजय ग्रंथ श्रावणात घरोघरी चालायचं. लहान होतो त्यावेळी या पोथीतील अध्याय संपल्याची खुण म्हणुन आम्ही स्वस्तिश्री रामविजय ग्रंथ सुंदर , संमत वाल्मिक नाटकाधार ही ओवी लक्षात ठेवत असु. ओवीबध्द ग्रंथ ऐकताना काही कळत नसायचं पण आण्णा खुप सोप करुन सांगायचे. संधी अन् विग्रह करुन आमच्याकडुनच शब्दांचे अर्थ काढुन घ्यायचे. ते दिवस खरंच रुपेरी चांदण्यांचे होते. ‘स्वस्तिश्री रामविजय ग्रंथ सुंदर ‘ ओवी आली की बाबाजी अबीर बुक्क्याची डबी हातात देत ग्रंथावर अबीर बुक्का वहायला सांगायचे. पुंडलिकवरदाऽऽऽ हा घोष झाला की….आरती सप्रेम जयजय विठ्ठल परब्रह्म ही दशावताराची आरती व्हायची. प्रसाद वाटला जायचा. जेवणाच्या पंगती झडायच्या, केळीच्या पानावरती मुद भात खायला मिळायचा. आता ते दिवस गेले. राहिल्या त्या फक्त पानांच्या बांधणीशी अडकुन पडलेल्या तुळशीच्या मंजिरी अन् त्याचा हवाहवासा वाटणारा सुगंध. मी कित्येक वेळ त्या आठवणीत हरवुन गेलो होतो. प्रत्येक सर्ग प्रारंभी दिलेली छायाचित्रं मी पहात होतो. सर्गासर्गामधुन जो वरी हे जग, जोवरी भाषण, तोवरी नुतन नित्य रामायण या गदिमांच्या ओळींची आठवण येत होती. चाळीस अध्यायांमधुन नित्य नुतन रामायण मला गवसतं होतं. काही दिवसांपुर्वी आईला कुणीतरी 'झोपाळ्यावरचे रामायण' नावाचं ओवीबध्द रामायण आणुन दिलं होतं. आईला वाचायला येत नाही. ती शिकलेली नसली तरी ती खुप शिकली होती. झोपाळ्यावरती माईलेकी बसल्या की स्वाती तिला ते रामायण वाचुन दाखवायची. असो, साडेदहा वगैरे झाले असतील माई वरती आली. जांभईदेत तोंडापुढे चुटकी वाजवुन म्हणाली,
''दादु मग सकाळी उठवु ना तुला…?''
''हो ..पण किती वाजता..?'', मी विचारलं…
''पहाटे साडेचार..‘’
''बापरे इतक्या लवकर ?''
''इतक्या लवकर कुठे रे .. रोजचाच वेळ असतो माझा तो. पण उद्या तु उठणार म्हणजे मला अर्धा तास तरी आधी उठायला हवं…चलं गुड नाईट मी झोपते लवकर अन् तुही झोप सकाळी मी उठवते तुला..''
झरझर आली तशी ती झरझर निघुनही गेली. पायर्या उतरताना तिच्या पैंजनांचा अस्पष्ट होत जाणारा आवाज तेवढा कानावर येत होता. मी आवरा आवर केली. अन् डोळ्यांवर झोपेची चादर ओढुन घेतली.
स्वातीच्या पहाटबोचर्या आवाजाने मला जागं केलं. सांगितल्याप्रमाणे तिने मला उठवलं. पटपट उरकुन घे सगळं अन् आंघोळ करुन खाली ये. स्वातीचं न्हाऊन झालं होतं. आईची मागच्या अंगणात झाडलोट सुरु होती. आंघोळवगैरे झाल्यानंतर मी खाली आलो. जिना उतरताना मी नकळत म्हणालो उठा राघवा उठा राजसा ..मला माहित नाही ते शब्द ओठांवर का आले ते.. हातात फुलांसाठी टोकरी घेऊन स्वाती उभी होती. सुपारी बागेच्या दिशेने आम्ही चालु लागलो. आकाशात चांदण्या गडद दिसत होत्या. शुक्राचा तारा उगवला होता. गार वारा अंगाला भिडला त्यात उत्साह भरुन राहिला होता. दुर विठ्ठल मंदिरात काकड्यासाठी वाजणारा मृदंग धिमी धीमी वाजत होता. बागेत फुले उमलु लागली होती. स्वाती हातात कळशी घेऊन मोगरीला पाणी घालत होती. बागेला पाटाचं पाणी होतं. तरी काही झाडांना ती स्वतः पाणी घालायची. मोगरीचं आळं एकीकडुन अशक्त झाला होतं. घातलेलं पाणी हळुहळु त्या बाजुला आलं अन् भळाभळा बाहेर वाहु लागलं. हातातली कळशी तिने बाजुला ठेवली. बाजुची मातीने ती आळं सारखं करत होती. मला स्वातीचं कौतुक वाटलं. मी मुद्दाम म्हटलो…
''अगं स्वाते कपडे खराब होतील ना आता तुझे मातीने..''
ती फिक्कट हसली अन् म्हणाली, ''झाले तर झाले. ही मोगरी खुप फुलं देते. हिची बटमोगरीफुलं देवाला वाहिली ना की सारा गाभारा कसा सुगंधित होतो. अन् कपडे खराब होतील म्हणुन मातीशी नातं तोडायचं का ? ''
हे वृक्षवल्ली आम्हां सोयरे तत्वज्ञान कदाचित तिला जास्त समजलेलं. मी काहीच बोललो नाही. आभाळातील जाईची फुलं मी पहात होतो. सप्तर्षीचा तारा. शुक्र, व्याध, धृवमत्स्य, मत्स्यपंज सारं अबोल आकाश..मनातल्या मनात भुपाळी गुणगुणणारं.. हातात फुलांची टोकरी घेऊन स्वाती फुलं गोळा करत होती. कोणतं फुलं आज अन् कोणत उद्या हे तिला चांगलचं ठाऊक होतं. जाई, जुई, मोगरा, प्राजक्त, चाफा, जास्वंद, मंदार, मालती फुलांची टोकरी भरुन गेली होती. ती फुलं तोडताना लता वेलींविषयी माहिती देत होती. हा विहानानुभव मला नवीन होता. हिरव्या हिरव्या पानांवर अत्तर सांडल्यासारखं दंव पडलं होतं. हळुहळु उजाडायला सुरुवात झाली. पक्षांचे स्वर गडद होऊ लागले. उठा राघवा उठा राजसा ..मी गुणगुणत होतो. घरी आलो. समोरचं टेबलवरती पेन अन् कागद पडला होता. ते शब्दब्रह्म प्रगटलं अन् भुपाळीच्या रुपाने शब्दाशब्दांच दहिवर मनभर पसरत गेलं.
उठा राघवा, उठा राजसा अरुणोदय झाला ।। ध्वृ ।।
पुर्व दिशेला गुलाल उधळीत
बाल रवी तो निराळ उजळीत
उदय होतसे वेदध्वनींचा शंख सुखे वाजला ।। १।।
राघवा अरुणोदय झाला….
यज्ञ मंडपी जमुनी मुनीजन
श्री विष्णुंचे करिती पुजन
पुजनीय त्या परमात्म्याचा अंश पहा पातला ।।२।।
राघवा अरुणोदय झाला….
सडे शिंपिले दारी अभिनव
प्राजक्ताचे रंग नुतन नव
नव पुष्पांसम बहरुन येऊन मोद अमित मातला ।।३।।
राघवा अरुणोदय झाला….
मलयगिरीहुन संथ झर्याहुन
गंध धावतो वृक्षशिखांवर
वृक्षशिखांशी कोकीळविणे पंचम स्वर लागला ।।४।।
राघवा अरुणोदय झाला….
दुग्धपान गो-शावक करिती
गोधन दोहत युवती गाती
गात चालले भाट भुपाळी छंद गोड योजला ।।५।।
राघवा अरुणोदय झाला….
गगणपटावर दिसते लाली
काय रंग तो तुझीया गाली
या गालीचे तेज पाहता सुर्य नभी हासला ।।६।।
राघवा अरुणोदय झाला….
तुझिया निढळी सुर्य प्रकाशे
तु चंद्रासम लोभस हासे
हास्य पाहाया या ओठींचे वात जरा थांबला ।।७।।
राघवा अरुणोदय झाला….
ही तेजाची सुरु आरती
रथा दौडवी अरुण सारथी
उठा, राघवा स्वर्णमखातुन मित्र पुन्हा जन्मला ।।८।।
राघवा अरुणोदय झाला….
मी लेखणी हातावेगळी केली. जाणवलं की, कोकीळ मंजुळ गाते पण तिचा बोलविता धनी मात्र वेगळाच असतो. माहेरपणाला आलेल्या सख्यांसारख्या ओळी जमत होत्या. फेर धरत होत्या. नाचत होत्या. गात होत्या. ही सर्व त्याचीच लिला होती. मी फक्त निमित्त होतो. राऊळांत घंटा झडत होती. प्राचीने लाल रंग उधळला होता. अन् हासर्या उषेमध्ये मी राममंदिराचा झळकणारा कळस पहात होतो. नकळत मनाचा भाव प्रगट झाला अन् त्या सोनेरी कळसाकडे पहात मी पुन्हा म्हणालो. यस्या: कृपाक्षमात्रेण जायन्ते विबुधा नरः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा