‘‘मिरा म्हणजे काय रे? ’’ किनार्याशी धडकणारा तुझा स्वैर सवाल....
तु कधी काय विचारशील हा कधी नियमच नव्हता ना ? आपल्यात ? अं ? भुरभुरत्या वाळुमध्ये अगदी
एकतारता तुझी...तुझ्या प्रश्नांची.. मी मात्र खेकड्याच्या तिरकस चालण्याने तयार झालेल्या
विथिकेसारखा वाकडा तिकडा..दोलायमान अवस्थेत...
‘‘मिरा म्हणजे काय?’’
मिरा..? माहित नाही गं.. तुच सांग ना..मी अगदी तिचाच प्रश्न
तिच्याकडेच भिरकवलेला..चणे फुटाणे खाऊन झालेल्या कागदी कोनासारखा...त्या मऊशार
वाळुमध्ये तीची नाजुक बोटे काही अक्षरे गिरवत होती. निःसंगपणे येणारी लाट ते शब्द
अनाहुतपणे पुसुन टाकत होती.
मला नाही ना रे माहिती म्हणुन तर विचारलं ना तुला ? थोडीशी खट्टु होऊनच तु.
मीच काय गं सापडतो तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर
मिळवायला ? मी.
सांगायचं नसेल तर नको सांगु. आई सारखी गुणगुणत असते म्हणुन
विचारलं तर, तु मात्र ढुऽम फुगलेल्या
बिलाव्यासारखा. मिरा के प्रभु गिरीधर
नागर...मैं तो दासी जनम जनम की .. वगैरे वगैरे तिची भाषा मात्र कळतं नाही. तिन्ही
सांज गुणगुणत असते. देव्हार्याच्या धुपासोबतच तिच्या अस्पष्ट ओळी कानावर पडतात.
छान वाटतं. मी अन् मुग्धा मुग्धपणे त्या ऐकत असतो.
हातातील कंकर पाण्याच्या दिशेने भिरकावत ती अशीच
बोलतं असते. तीच हे असं स्वच्छंदी बोलणं मला का आवडतं ते माहीत नाही. तिच्या
शब्दांत तत्वज्ञान वगैरे नसतं. उपदेशाची भाषा नसते. निखळं बोलणं, तिची बोलण्याची पध्दत, डोळ्यांची लाक्षणिक हालचाल, ओठांची लवलव, अन् प्रत्येक शब्दाभोवती गुंफलेलं, समेभोवती खळखळणारं निखळं हास्य ! बाकी देव कुणाला काय
देऊन जातो ते कळतं नाही. तीची अनस्युत बडबड चालु असते.हो पण त्या बडबडीला अनावश्यक, वायफळ वगैरे जुलमी शब्द का लावावे ? काही लोक असेच असतात...अर्थगर्भ ! विवक्षित अर्थाने सांगणं तसं कठीण असलं तरी तिचे शब्द
एवढे तलस्पर्शी का हे मला अद्याप न उकललेलं कोडं आहे.
अहो मिस्टर, मी तुमच्याशी बोलतेय !! तु
डोळ्यासमोर मोरचेलासारखा सुंदर हात वर खाली झुलताना
दिसतो. मी भानावर येतो. एव्हाणा तुझ्या सिध्द झालेल्या कथ्थकातुन जन्माला आलेली
एखादी अभिजात मुद्रा अन् डोळ्यांच्या भावपुर्ण विलासातुन साकार झालेल्या
नेत्रपल्लवीने मला प्रश्न केलेला असतो. ‘ काय कुठे हरवलाय ?
‘’ ते आपलं मिरा...’’ मी जरा अडखळतचं.
‘’ हो सांग ना रे... मिरा म्हणजे काय ?’’, अगदी मांजरीच्या पिल्लासारखी मिचमिचल्या डोळ्यांनी
पाहणारी... तु ‘’ मी आण्णांना विचारुन सांगु का
?’’
‘’ आण्णांना ?’’
‘’ ‘’हो ‘’
‘’ का रे ?’’
‘’ असंच. म्हणजे मीरा राधा या आम्हाला घराच्या अंगणात तर
भेटायच्या. तिन्हीसांजा झाल्या की शुभं करोती व्हायची. घरातील नंदादिप उजळायचा.
अंगणात हळु हळु शाळाच भरायची चांदण्यांची......त्या चांदण्यांच्या शुभ्र प्रकाशात
आण्णांनी कितीतरी गोष्टी आम्हाला सांगितल्या. श्लोक शिकवले, हार्मोनिअम घेऊन बसले की ते नेहमी गीतरामायण गात असत.
त्या जर्मन स्वरांचे नाद अजुनही माझ्या श्रवणांच्या ठायी ताजे आहेत. आण्णा मिरेचं
कोई कहीयो रे प्रभु आवन की हे पद विशेष गायचे. त्यातुनही, उच निच काही नेणे भगवंत हा मंगलाचरणातला अभंग गाताना
मिराबाईसाठी घेतो विष प्याला हे कडवं किती गोड गायचे म्हणुन सांगु? ती अभिषेकी बुवांचीच करणी म्हणावी लागेल.
नैमिषारण्यात शौनकादिकांनी जे सुख अनुभवले असेल तेच सुख त्या मंद चांदण्यांच्या
प्रकाशात आम्ही अनुभवले. त्या आनंदाला तोड नाही. किती ही मोठे झालो तरी आज ते सुख
विकत घेता येणार नाही. मी, प्रेमाताई, मयुरदा, माई, अमृतदा आण्णांभोवती रिंगण
करुन बसत असु. शेणाने सारवलेलं अंगण. थंड पडलेल असायचं. पहाटे काढलेल्या रांगोळीवर
जाईच्या मंडपातुन फुलांची पखरण व्हायची. गोठ्यातील पयस्विनींच्या गळ्यातील घंटांची
निबंद चालणारी मंद किनकिन वातावरणात भरुन जायची. कृष्णकमळाभोवती पराग जसे गोलाकार
बसलेले असतात त्याच स्थितीत आम्ही सारे बसायचो. आण्णानी गोष्ट सांगायला सुरुवात
केली की सारी मंडळी आमच्या सारखीच आण्णांभोवती गोल करुन बसायची. .सांगताना आण्णा आम्हाला शब्दांचे अर्थ सांगायचे. द्वंद्व, बहुव्रिहीतील
उकल, संधी
विग्रह सांगायचे.आण्णांची कथा ही कधी इतिहासात नव्हतीच. त्यांनी आम्हाला कथा
सांगितल्याच नाहीत. तर त्या जिवंत केल्या. त्यांनी सांगितलेली कथा ऐकताना अंगी
अष्टांगभाव दाटले नाहित अस कधी झालचं नाही. नऊ रसांत भिजलेली ही वाणी म्हणजे अमोघ
वक्तृत्वाची जननीच ! मला आठवतं, एकदा अशाच सांजवेळी आण्णांनी मिरा
आम्हाला सांगितली होती. पग घुंगरु बांध मिरा नाची रे..मै तो अपने नारायण की हो गई
रे हे मिरेचं पद आण्णांनी मयुरला शिकवलं होतं. हे पद संपलं तेव्हा सहज मिरेचा विषय
निघाला होता. आण्णांनी त्या रात्री दोन कथा सांगितल्या होत्या एक मिरेची अन् दुसरी
आलवार भक्त कोदई.’’ केवढी
बडबड करतो राव मी.
‘’कोदई ? ही कोण रे ?’’, तुझा कूंहाकार
कोदई ही मिरेची पुर्ववर्ती संत आहे. तिच्या नावाबद्दल
अनेक प्रवाह आहेत. कदाचित वैजयंती हे तिच नाव असावं. बाकी तिला गोदा असंही ओळखतात.
पोक्तपणे सांगता येत नाही पण तिचा काळ मिरेच्या किमान सातशे साडेसातशे वर्षे
आधीचा. मिरेचं अन् कोदईचं चरित्र म्हणजे परस्परांना प्रकाशित करणारे दोन बिलोरी
आरसेच. कोदई हे तमिळ नाव आहे. कोदई म्हणजे कुसुमांच्या हाराप्रमाणे कमनीय अन सुंदर
असणारी !!
‘’अन् मिरा म्हणजे ?’’
अगं थांब थांब सांगतो ना इतकं उतावळ असु नये गं.
पहिली कोदाई तर समजुन घे.
‘’ ठिक आहे. पण आज मी मिरा ऐकल्या शिवाय इथुन अशी उठायची
नाहीच, मग भले काहीही होवो’’, तु तुझ्या नेहमीच्या हट्टीपणात..
‘’बरं, मग कोदई राहु दे मिरा ऐक’’, मी उगीचचं तिच्या मनाचा ठाव घेण्यासाठी.
‘’ नको नको आधी कोदई मग मिरा’’, तु अगदी निखालस..
बरं..विल्लपत्तुर नावाचं एक
खेडं आहे. राष्ट्रकुटांच्या राज्यामध्ये कदाचित राजा दंतीदुर्गाने वसवलेल्या मदुरा
जिल्ह्यातील हे छोटसं गावं. विष्णुचित्त नावाचा एक विद्वान ब्राम्हण या नगरीमध्ये
रहात होता. एकदा असाच पुजेसाठी फुले तोडायला गेला असता त्या पुष्पवाटीकेत त्याला
एक नवजात कन्या दिसली. कुणीतरी अभागी स्त्री त्या अभागी जिवाला वाटीकेमध्ये टाकुन
गेली होती. विष्णुचित्तालाही मुलबाळं नव्हतं त्याला मोठा आनंद झाला. ईश्वराने जणु
त्याला प्रसाद दिला होता. विष्णुचित्त अन् त्याची भार्या त्या मुलीचं पालन पोषण
करु लागले. पुष्पमालांमध्ये गुंडळलेली सापडल्याने नाव ठेवलं कोदई. हळुहळु कोदई
मोठी होऊ लागली. व्दारकाधीशाच्या पुजेसाठी बनवलेल्या पुष्पमाला ती आपल्या गळ्यात
घालुन फिरतं असे. वडिल विष्णुचित्त तीस रागे भरतं. पण कोदईने गळ्यात घातलेली माळ
व्दारकाधिशाच्या गळ्यात घातली तर ती मुर्ती अधिक प्रसन्न दिसु लागायची.
विष्णुचित्तास वाटले ईश्वराची अगाध कृपा आहे आपल्यावर ज्याने आपल्याला ही मुलगी
दिली. शैशवावस्था संपुन जाणतेपणाकडे कोदई जाऊ लागली. तीचा हा प्रवास ईशभक्तीकडेच
जाणारा होता. ती स्वतःस श्रीकृष्णाची सखी मानु लागली. गोपिका मानु लागली.
अंतःकरणात कृष्णभक्तीची फुले विकसित झाली होती. देवा तुझी मी दासी ही भावना
चिन्मयस्वरुप झाली होती. उपवर होताच तिने विवाह करण्यास स्पष्टपणे नकार दिला.आपला विवाह
पुर्वीच त्या भगवान श्रीकृष्णासोबत झाल्याचे तिने सांगितले. विष्णुचित्ताला मोठी
काळजी वाटु लागली. एक दिवशी भल्या पहाटे विष्णुचित्ताला दृष्टांत झाला. तुझी पोर
सत्य बोलतं आहे. विष्णुचित्ताला मोठा आनंद झाला. श्रीरंगम क्षेत्री त्याने मोठ्या
थाटामाटात अवघ्या जगाला रंगवणार्या श्रीरंगासोबत रंगनाथासोबत तिचा विवाह लावुन
दिला. कोदई त्या भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीसोबत पत्नी भावनेने राहु लागली. हे
दिव्य होते. अव्दितीय होते. अभुतपुर्व होते. आयुष्याच्या वाटेवरती ती कृष्णमय होऊन
गेली. असं सांगतात की, भगवान श्रीकृष्णाच्या
मुर्तीतचं ती अंतर्धान पावली. जिवन एक व्रत म्हणुन व्रतस्थपणे ती जगली. ऐहिक
जगताच्या क्षुधा, तृषा, मोह, शोक, जन्म आणि मरण या षड्उर्मीं पासुन मुक्त झाली. तिने
तिरुधावै म्हणजे श्रीव्रत अन् नाच्चियार तिरमौली अर्थात कोदईचे श्रीसुक्त या आलवार
भक्त परंपरेतील मोठ्या सुंदर रचना लिहल्या.
‘’ असं कसं जगता येईल रे ? इतकं आत्ममग्न? खरचं जगता येईल का रे कुणाला ? ‘’, तुझा सहज प्रश्न..
‘’ व्रतस्थ जगण्याएवढी दुसरी मजा नाही. ती कलंदरी
कुणालाही साध्य होतं नाही. मन अन् बुद्धी दोन्हीही बळकट असाव्या लागतात.’’
‘’हो ना ! अन् मिरेचं काय रे ? तिची ही अशीच परिस्थिती असेल काय ?’’
बोलता बोलताच तिचा फोन वाजला.
‘’ बापरे काका.... . ‘’ काका, मी मैथिलीकडे आले आहे. हो निघतेच आहे आता....अर्ध्या
तासात पोचते घरी ’’ हुऽऽश करतं तिने फोन ठेवला.
‘’ चल मी निघते, काका घरी आलेत मी जर अर्ध्या तासात पोचले नाही ना
तर........’’
‘’ अगं थांब गं काहीही झालं तरी मी मिरा ऐकवल्याशिवाय तुला
सोडणार नाही ‘’, मिश्किलपणात मी.
‘’ अरे बाबा जाऊ दे ना... वेळेवर नाही ना पोचले घरी तर
आयुष्यभर मलाच मिरा बनुन रहावं लागेल तुझी... ‘’ मिश्किलपणात काहीही बोलुन जातो ना आपणं...
वेड्यासारखे .. ? बालिश ... ? अं .....? असो, तु गेल्यावर मी तसाच त्या
खडकावर बसुन राहिलो. सुर्यबिंब क्षितीजाला टेकले. पक्षी आपापल्या घरट्यांकडे
निघाले होते. फस्स ऽऽ फस्स ऽऽ फुत्सारुन लाटा किनार्यावर आदळत होत्या. निःसंगपणे
...एकाकी..सुर्यास्त...
रात्री मी घरी आलो. जेवणं झाली. झोपाळ्यावर आण्णा
एकटेच गुणगुणत बसले होते. नाही पुण्याची मोजणी नाही पापाची जाचणी, जिणे गंगौघाचे पाणी हे अभिषेकींनी अजरामर करुन
ठेवलेलं पद त्यांच्याभोवती सदै॓व रुंजी घालत असतं. झोपाळ्याच्या पितळी कड्यांवर
हात हात नेत .....
‘’ आण्णा, एक विचारु ? ‘’, मी
‘’ अरे वा !! विचार की ‘’, आण्णा प्रसन्नपणे हसत म्हणाले.
‘’ आण्णा मिरा म्हणजे काय हो ?’’, मी
‘’ संस्कृतात मिरा म्हणजे
उदकराशी, पुष्करीणी..सरोवर..दिर्घिका..
दुसरा अर्थ म्हणजे मीर म्हणजे श्रेष्ठ. मीर या शब्दातुनच मग मिरा हे नाव साकार
होतं. कदाचीत मिहीर म्हणजे सुर्य हे मिरा या नावाचं व्युत्पत्ती स्थान असावं.
सुर्यासारखी तेजःपुंज असणारी मीरा..का रे पण आज असं अचानक का विचारल ? ‘’
‘’नाही म्हणजे ते जरा मिरेचं पद आठवलं सहज म्हणुन
विचारलं ‘’, मी जरा अवघडुनच उत्तर दिलं.
‘’ कोणतं ते ? ‘’, जेष्ठमधाची पुड दुधात टाकत त्यांनी सहज विचारलं.
मी गडबडतचं म्हटलं ते ...... ...’’ नाही का.... प्यारे दरसन दिज्यो आय, तुमबिन रह्यो न जाय ... मिरा दासीं जनम जनम की पडी तुम्हारे
पाय ’’ अगदी योग्य वेळी उत्तर आठवल्यासारखा खुश झालो.
‘’ अरे वा !! छान ! क्यों तरसावो अंतरजामी , आय मिलो किरपाकर स्वामी, मिरा दासी जनम जनम किं पडी तुम्हारे पाय, दिपा, मिरा नेहाची विदग्ध मुर्ती आहे. साधिका आहे.
कल्याणकारी तुळशीच्या मंजिरी सारखी ती सुगंधी अन् पवित्र आहे. मिरेच्या भजनातील एक
गुढ आहे. संयोग वियोगाने तिला जणु घेरुन टाकलं आहे. तिच्या कृष्णभक्तीच्या
अनुरागांच्या भजनांमध्ये तिने मनमोहनासाठी मोत्यांनी चौक भरला, जाई जुईच्या फुलांनी शेज सजावली, पापण्यांची तोरणं बांधली, डोळ्यांची निरंजणे उजळवली. पण अनुरागापेक्षाही मिरेचा
विषादयोग काळीज चिरुन टाकणारा आहे. शुन्य करणारा आहे. दग्ध करणारा आहे. निघोट आहे.
तिच्या शब्दाशब्दांत प्राणांतिक वेदना आहे. तिचा विरहानुभव अधिक मुखर, अधिक मार्मिक, तलस्पर्शी ह्रदयस्पर्शी, काळजाला भिडणारा आहे. ‘ जब बैरीने कबरी पकरी, तंबही मान मरोरी, प्रभुजी लाज रखो तुम मोरी’ हा भौतिक ताप क्षीण, देहधर्म गौण, पण ह्रदयस्त वेदना निर्मळ, निखळ, जागृत, पवित्र अन् निस्सिम....!’’ आण्णा बोलत होते. मी शांत मनाने ही समुद्राची गाज ऐकत
होतो.
नानांची आण्णांना हाक आली. आण्णा उठले अन् नानांसोबत
रायांगणात फिरायला निघुन गेले. आईला प्रेमाताईचा फोन आला. ती तिच्याशी बोलत बसली.
ताईचं लग्न झाल्यापासुन रोज याच वेळी आई तिच्याशी बोलत असते.
मी उठलो. केवड्याचा मत्त सुगंध वार्यावरती पसरला
होता. माझ्या मनात आण्णांचे शब्द अजुन तराळत होते. डायरी उघडली. पहिला शब्द लिहला
मिरा...शांत पाण्यावर तरंग उठावेत असचं झालं. लिहावसचं वाटेना. मी पुन्हा बाहेर आलो. तुळशी
वृंदावनाच्या कट्ट्यावरती, वृंदावनाला स्पर्श न करता
बसलो. तिन्हीसांजा ढळुन गेल्यानंतर एकदा दिवे लागनी झाली की त्यानंतर आई आम्हाला
कधी वृंदावनाला स्पर्श करु दिला नव्हता. तिला ते आवडत नाही. मी अंधश्रध्दाळु नाही.
पण आईच्या श्रध्देपुढे जाता येत नाही. मयुरदाच्या खोलीतुन तंबोर्याचा स्वर अन् नै रे लगन
मोहे लागी चे स्वर कानावर येत होते. आण्णांचा शब्द अन् शब्द बरसणारा मल्हार होता.
मी विचार करु लागलो.
खरंच मिरा ही दंतकथा नव्हे ही खरीखुरी कहानी आहे. जी
ऐकताना देहधारी चल सजीवही स्तब्ध व्हावे अन् अचल, जड निर्जिवांनाही चैतन्याचे रोह फुटावे. मिरा ही खरचं
विशुध्द प्रेमाचा गाभा आहे. ज्याच्यावरती प्रेम तो मुर्ती स्वरुप, बुत, त्याची ना लौकीक साथ ना
सोबत...तरीही त्याच्या शिवाय दिवसा चैन नाही, रात्री झोप नाही. मिरा ही अशीच आहे. आत्मसंयमातुनच
विरहावस्थेत समर्पणाची अन् त्यागाची भुमीका तयार झालेली. त्या प्रेमाची पराकाष्ठा
म्हणजेच तीचा समर्पणभाव. हा समर्पण भावही त्यागध्वरामधुन निर्माण झालेला...कदाचित
विरहाच्या अंतिम कक्षेत असं दिव्य समर्पण सिध्द होत असावं. समर्पण भावासाठी एक
गोष्ट मात्र आवश्यक ते म्हणजे निखालस, निर्भेळ, अन् शुध्द अंतःकरण कारण चित्त शुध्दते शिवाय त्यागाचा, समर्पणाचा परीपाक घडणे कठीण ! कापट्य भरलेल्या
अंतःकरणात समर्पणाची फुले कधी फुलतात काय ?
मनात कुठुनशी मिरा जागृत झाली. भाववेडी मिरा. आर्त
मिरा...मुग्ध मिरा... मुक्त मिरा..उन्मुक्त मिरा... आण्णांच्या झोपाळयाशेजारच्या
लेखणमोहिर्यातुन लेखणी अन् कागद घेतला. नक्षत्रपतिच्या नितळ प्रकाशात अन्
वृंदावनाच्या कट्टयावर मिरेची ही विरहीनी जन्म घेत होती.
विरहातली वेदना, सख्या तुला मी सांगते,
काळजाचं निरुपण, दोन शब्दांत मांडते ।।1।।
होत मन वेडपिसं, मेघ मल्हार भंगतो,
भैरवीच्या रे स्वरांनी, ओठी केदार रंगतो ।।2।।
हाती हातीचं कंकण, जड होतं बेडीपरी,
विरहाच्या रे ऋतुत, शुध्द श्रावणाच्या सरी ।।3।।
डोळ्या डोळ्यांतीलं पानं, होत वेड कुणासाठी,
तुझी आठवं आठवं, भरलित दिठी दिठी ।।4।।
नको होतो विखापरी, पानातील गोड घास,
दोन आतुर पाऊले, होता तुझा गोड भास ।।5।।
पैल शब्द मुके होती, बोले अबोली विनिता,
राघवाच्या विरहात, खिन्न झाली असे सिता ।।6।।
एक विरह उर्मिला, शोभे सौमित्री अंगना,
लक्ष-मनांचा सुवास, तिच्या सोन्याच्या कंगना ।।7।।
पायी देहुडा, देहुडा, कुठे गेलासी माधवा,
तुझी मुरली मजसि, ऐकु येईल केधवा ।।8।।
ह्रदयातील वेदना, हास्य सुरेख झाकते,
विरहिनी मिरा राणी , तुझी करुणा भाकते ।।9।।
लेखणी मोहिर्याच्या संदुकीमध्ये ठेऊन मी वर आलो.
झालेली कविता घडी घालुन डायरी मध्ये ठेवली. अकरा वाजले होते. डोळ्यांवरती झोप आली
होती. झोपताना मोबाईल पाहीला. ओठावरती हासु उमटलं.. अपेक्षेप्रमाणे तुझा मेसेज....
‘’.’’
‘’..’’ मी
‘’ व्हॉट्स अबाऊट मिरा...?’’, तु
‘’ मी अन् रा.....’’ ओठावर हसु दाबत मी..
‘’ ☹ ’’ तु चिडुन.....
‘’ :-) ‘’ मी
‘’
उद्या जर नाही सांगितल ना तर बघ...गुड नाईट .....’’, एकदम धमकीच...
‘’गुड नाईट स्वीट ............’’ मी.
‘’ दिपदा लाईट बंद कर आधी ...थांब मी उदया आईलाच सांगणार
आहे तुझा मोबाईल काढुन घ्यायला.. ‘’ अंथुरणातुनच धमकी देत
स्वाती.. काय करणार बाबा, मी घाबरलो अन् शांतपणे लाईट बंद करुन झोपी गेलो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा